साबुदाणा बटाटा उपवासाची चकली
प्रस्तावना:::
उन्हाळ्यामध्ये आपण उपवासाची अनेक पदार्थ तयार करत असतो… जे आपल्या वर्षभर ज्या ज्या वेळेस उपवास असेल त्या त्यावेळेस तळून खाता येतील… त्यासाठी आपल्याला नरम अशी साबुदाणा आणि बटाट्याची चकली… या चकलीला योग्य प्रमाण अत्यंत गरजेचे असते… जेणेकरून चकली ही मऊ होईल….
साहित्य:::

अर्धा किलो साबुदाणा ,एक किलो बटाटे ,तिखट, जिरे ,मीठ, पाणी, तळण्यासाठी तेल
कृती:::
सर्वप्रथम रात्री अर्धा किलो साबुदाणा एका मोठ्या पातेल्यामध्ये भिजत घाला..

मोठ्या पातेल्यात भिजत घातल्यामुळे साबुदाणा पसरट असा व्यवस्थित रित्या भिजेल… साबुदाणा भिजवताना साधारण दोन पेर इतके पाणी वर ठेवावे… त्यामुळे साबुदाणा अगदी मऊ भिजेल….

दुसऱ्या दिवशी सकाळी… एक किलो बटाटे कुकरमध्ये दोन ते तीन शिट्या घेऊन शिजवून घ्या…
बटाटे सोलून घ्या आणि ती चाळणीवर बारीक असे किसून द्या…
किंवा स्मॅशरच्या साह्याने लगदा बनवून घ्या… लगदा बनवतांना एकही गाठ राहू देऊ नका… कारण चकली पडताना या गाठी साच्यामध्ये अटकतात…
त्यामुळे तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता…. बटाटे सर्व किसून झाल्यानंतर एका बाजूला ठेवा… एका पितळी पातेल्यामध्ये पाणी गरम करा…
साधारण दोन ग्लास पाणी इतकी आपल्याला गरम करायचे आहे…. त्यानंतर त्यामध्ये तिखट घाला.. आणि चवीप्रमाणे मीठ घाला…
इथे साधारण एक ते दीड चमचा तिखटाचा वापर मी केलेला आहे… चकली जास्त तिखट नको नाहीतर चकली खाताना ठसका लागतो…..
त्यानंतर त्यामध्ये उकळी आल्यावर साबुदाणा घाला… साबुदाण्याला झाकण ठेवून चांगले एक ते दोन वाफ येऊ द्या… साबुदाणा चांगला चमकायला लागेल….
त्यामध्ये अजून एक ग्लास तुम्ही पाणी घालू शकता… मिश्रण मऊ असायला हवे…. त्यानंतर आपले मिश्रण चांगले वाफल्यानंतर ते खाली उतरून घ्या…
इथे तुम्ही हलवताना चाटू चा वापर करू शकतात…. आता यामध्ये उकडलेल्या बटाट्याचा लगदा घालून घ्या…
आणि बटाटा साबुदाण्याचे मिश्रण एकदम व्यवस्थित एकत्र करून घ्या…. सर्व मिश्रण एकत्र व्यवस्थित झाले पाहिजे…
सर्व मिश्रण एकत्रित झाल्यानंतर आपण प्लास्टिकच्या कागदाला ओले करून घ्या आणि त्यावर साच्याच्या साह्याने चकल्या पाडून घ्यायच्या आहेत….
तुमच्याकडे साचा नसेल तर एखादी मिठाच्या पिशवीला कोपऱ्याला कट करून त्यामध्ये मिश्रण भरून आपण या मधून सुद्धा गोल चकल्या पाडू शकतो…..
अत्यंत गोल चकल्या पडतात…. साच्यापेक्षाही चांगल्या चकल्या पिशवीने टाकता येतात….. या पद्धतीने मी दोन्ही कागदांवर सर्व चकल्या गाळून घेतल्या….
साधारण दोन दिवस या चकल्या वाळण्यास लागतात…. दुसऱ्या दिवशीही या चकल्या उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या…
म्हणजे वर्षभर त्याला भुंगा लागत नाही…. किंवा त्या खराब होत नाही… ज्यावेळेस चतुर्थी किंवा एकादशी असे उपवास येतात त्यावेळेस आपण या चकल्या तेलामध्ये तळून घेऊ शकतो…
आता खमंग अशा चकल्या आपण तेल गरम करून तळून घेतले आहे….
आपल्या उन्हाळ्याच्या वाळवण्याच्या बटाटा आणि साबुदाण्याची चकल्या तयार आहेत…..

टिप्स:::;
इथे मी फक्त साबुदाणा वाफवून घेतलेला आहे… नंतर गॅस बंद केलेला आहे आणि बटाट्याचा लगदा खाली उतरवल्यानंतर एकत्र केला आहे…. बटाटा घालून साबुदाणा वाफवू नका… चकली कडक येईल…
Also available Here
Also available Here
